Month: April 2026

अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य

प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक मुंबई,: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठी भाषेची अनिवार्यता, अंमलबजावणीची रूपरेषा आणि प्रशिक्षणाचा आराखडा यावर व्यापक चर्चा होणार आहे. वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

 मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याला वेग

 जपानी J-स्लॅब तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर मुंबई : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याच्या कामाला वेग आला असून, जपानी ‘शिंकान्सेन’ तंत्रज्ञानावर आधारित J-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक प्रणालीचा भारतात प्रथमच वापर होत आहे. ही प्रणाली RC ट्रॅक…

 मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग टोल वसुलीला जून २६ पासून सुरुवात?

   सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल वसुलीची निविदा प्रसिद्ध…!  स्थानिकांना सवलत, सूट नाही..! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबई -गोवा राष्ट्रीय  महामार्गाचे चौपदरीकरण (एनएच -६६) येत्या मे, २६ अखेरपर्यंत पूर्ण  करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असतानाच आता या महामार्गावरील टोल वसुलीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कसाल  यांच्यामध्ये असलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर लवकरच टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. या टोल नाक्यावर वसुलीसाठी यापूर्वी एका एजन्सीला  नियुक्ती देण्यात आली होती.मात्र १४ जून २०२३ रोजी वसुलीला सुरुवात होताच सर्व राजकीय पक्ष  आणि टोल विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र झालेल्या सिंधुदुर्गवासीयांनी वसुली बंद पाडली होती. त्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत गेली तीन वर्षे टोल नाका सुरू करून वसुली करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र आता याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या असून १७ एप्रिल ला या संदर्भात ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१२ सालापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले असून येत्या मे, २६ अखेर ते पूर्णत्वास जाईल अशी घोषणा गडकरी यांनी १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलताना केली होती.  त्यानंतर आठवड्याभरातच टोल वसुलीची निविदा काढण्यात आली आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या निविदेमध्ये कणकवली शहराजवळचा जानवली पूल ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग- गोवा सीमा) या ६० किलोमीटरच्या लांबीच्या महामार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांच्या टोल वसुलीसाठी संस्था निश्चित केली जाणार आहे.दरवर्षी या वाहनांकडून टोलच्या स्वरूपात  स्वरूपात ५८ कोटी रुपयांचा महसूल   मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ओसरगाव टोल नाक्यावरील  टोल वसुलीला सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याची प्रक्रिया महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या टोल वसुलीतून स्थानिक वाहनांना वगळण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते मात्र निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख नाही मात्र इतर वाहनांपेक्षा स्थानिक वाहनांना काही प्रमाणात सवलत देण्यात आल्याचे निविदे वरून स्पष्ट होत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोटार गाड्या जीप आणि व्हॅन यासारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण वाहतुकीचे प्रमाण हलक्या वाहनांचे वाहतुकीचे प्रमाण ४९ टक्के आहे बस आणि ट्रक दोन ऍक्सल वाहनांचे प्रमाण २७% मल्टी ऍक्सल वाहनांचे प्रमाण १९% असल्याचे नियोजित निविदेत निविदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

 चाळ परिसरातील सुशोभीकरण व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर तोडक कारवाई

 राजेश कदम यांच्या मध्यस्थी मुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई तात्पुरती थांबविली कल्याण : डोंबिवली पश्चिम येथील रेल्वेच्या पडीक जागेत समाजसेवक व नवनिर्वाचित मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी स्व खर्चातून जे लाखो रुपये खर्च करून नंदनवन फुलविले होते, ज्येष्ठ नागरिक व त्या रस्त्याने जा ये करणाऱ्या थकल्या भागल्या जिवाला एक आसरा व विरंगुळा निर्माण झाला होता. वर्षानो वर्ष पडीक अश्या रेल्वेच्या जागेत जी जागा चरसी नश्या करणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डा ठरलेली त्या जागेचे रूपांतर सुंदर विरंगुळा केंद्रात निर्माण झाले. त्या विरंगुळा केंद्रावर आज रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकारी आणि रेल्वे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह जेसीबी मशीन सह अचानक तोडक कारवाई केली. ती जागा रेल्वेची असली तरी तेथे कुठल्याही प्रकारचा रेल्वे प्रकल्प येत नसताना, कुठलेही व्यापारीकरण नसताना नागरिकांना उपयोगात येणाऱ्या दुर्लक्षित जागेवर रेल्वेला अचानक कारवाई का करावीशी वाटली हा प्रश्न शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित करून तिथे उपस्थित राहून स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून रेल्वेची ही दादागिरी मोडीत काढून जोवर रेल्वे तेथे काही करत नाही रेल्वे मालक असेल तरी नागरिकांना तोवर वापर करण्याचा अधिकार असावा ह्या समझोत्यावर आजची कारवाई थांबविण्यासाठी राजेश कदम यांनी यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने जमा होऊन रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध केला व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे बाकडे का पाडले असा जाब विचारला. या प्रसंगी प्रल्हाद म्हात्रे, तुषार शिंदे, जनार्दन म्हात्रे, केतकी पोवार व अनेक सामाजिक कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते.

कुशिवलीच्या युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीत राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

  अशोक गायकवाड रायगड- कर्जत : उद्योग संचालनालय, मार्फत विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची १७ ते १९ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय राज्य स्तरीय परिषद युनिव्हर्सल एआय युनिर्व्हसिटी, कुशिवली,कर्जत जि. रायगड येथे संपन्न झाली. यावेळी विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची राज्य स्तरीय परिषद-२०२६ करीता राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह,(भाप्रसे), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्येाग) वैभव वाघमारे(भाप्रसे), अतिरिक्त उद्योग संचालक, बाळासाहेब यशवंते यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योग विभागाचे सर्व विभागीय उद्योग सह संचालक, सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया उपस्थित होते. उद्येाग संचालनालयाद्वारे राज्यात उद्योग व स्वंयम रोजगाराकरिता अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विकासात्मक योजनासाठी व राज्याच्या एकूण औद्योगिक विकासासाठी राज्याचे उद्योग,गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५ जाहीर झालेले आहे. या परिषदेत राज्याचे औद्योगिक गुंतवणूक, सेवा उद्योग धोरण-२०२५, माहिती तंत्रज्ञान धोरण, व्यवसाय सुलभता,मैत्री इ. विषयांवर सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातील सर्व अधिका-याकरीता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) चा प्रशासकीय कामात वापर यावर ए‍क दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्येाग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे संदिप पाटील यांनी राज्यस्तरीय परिषदेस उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

नाल्यातील विद्युत केबल्स धोकादायक

महापौरांचे तातडीचे निर्देश ठाणे :  नालेसफाई कामादरम्यान नाल्यातून गेलेल्या विविध प्राधिकरणांच्या विद्युत (केबल्स) अडथळा ठरत असून या केबल्समुळे नाल्यातील कचरा अडकून राहतो आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. नालेसफाई व्यवस्थ‍ित होण्यासाठी नाल्यातून गेलेल्या विद्युत केबल्स एकत्रित करुन  केबल्स सुरक्षित राहतील व कामातही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिका तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळ तसेच टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत दिले. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी ठाणे शहरातील नालेसफाई कामाचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगरअभ‍ियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळाचे माणिक राठोड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभ‍ियंता चंद्रमणी मेश्राम, सतीश जाधव, टोरंट पॉवर कंपनीचे सन्होसेन खोब्रागडे, मदन धामुणसे आदी उपस्थित होते. नाल्यातून गेलेल्या केबल्सच्या जाळ्यामध्ये कचरा अडकणे, तसेच लोंबकळत असलेल्या केबल्समुळे नाल्यातील जेसीबीला अडथळा निर्माण होणे, केबल्स तुटणे, नाल्यात उतरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या केबल्समुळे कर्मचाऱ्यांना अपघात होणे हे प्रकार घडत आहेत. यासाठी ज्या ज्या कंपन्याच्या केबल्स नाल्यामधून गेलेल्या आहेत त्यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन सद्यस्थ‍ितीत या केबल्स एकत्रित करुन नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करुन ठेवाव्यात अशा सूचना महापौरांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच याबाबत प्रत्येक कंपन्यांनी त्यांच्या स्तरावर बैठक आयोजित करुन भविष्यात नाल्यातील केबल्स या भूमीगत करता येतील किंवा कसे याबाबतच्या उपाययोजना तयार कराव्यात. तसेच भविष्यात ना्ल्यातून किंवा गटारातून कोणतीही केबल जाणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. तसेच केबल्स टाकताना महानगरपालिकेची परवानगी घेवूनच सर्व कामे करण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या. तसेच जे प्राधिकरण परवानग्या न घेता केबल्स टाकतील अशांवर दंड आकारण्याबाबतही महापौरांनी सूच‍ित केले. 00000000

 ठामपा आस्थापनेवर भरती प्रक्रियेमध्ये कोविड कालावधीत काम करणाऱ्यांना प्राधान्य द्या

  उपमहापौर कृष्णा पाटील यांचा प्रस्ताव अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेच्या भरती प्रक्रियेमध्ये  कोव्हिड  -१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागात ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीरुपी प्रस्तावाची सूचना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत  मांडणार असून भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांनी त्याला अनुमोदन दिले आहे. ठाणे महापालिकेमध्ये सध्या विविध संवर्गाची सरळसेवेने भरती करण्याची प्रक्रीया चालू असून, त्या अनुषंगाने प्रशासनाकडून कार्यवाही सुरु आहे. परंतू सदर सरळसेवा भरती करतांना, ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागामध्ये ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करणे जरुरीचे आहे.ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत जाहिरातीन्वये विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तसेच काही विभागामध्ये अत्यावश्यक बाब म्हणून ठोक पगारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतू सद्या ठाणे महापालिकेत चालू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना प्राधान्यक्रम न दिल्यामुळे त्यांचेवर अन्याय करण्यासारखे होईल अशी भावना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. सन २०२२ मध्ये कोव्हीड-१९ च्या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर घेण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा प्रकारची चर्चा होऊन, त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास सूचना केल्याचे कृष्णा पाटील यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले असून ठाणे महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रीयेमध्ये कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी वर्ग व इतर विभागात ठोक पगारावर काम करणारे कर्मचारी या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, त्यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी उपमहापौर कृष्ण पाटील यांनी केली आहे. सदर प्रस्तावाची सूचना आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन, चर्चा करुन, त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची विनंतीही कृष्णा पाटील यांनी केली आहे.

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

  मुंबई: आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होणाऱ्या सांघिक कॅरम स्पर्धेच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यातील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क निवड चाचणी कॅरम स्पर्धा २५ एप्रिल रोजी होणार आहे. दादर-पश्चिम येथे ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार असून त्यांना १ मेपासून होणाऱ्या सांघिक स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. १८ एप्रिलपासून सुरु झालेल्या कामगार व शालेय मुलामुलींच्या महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त साकारीत असलेल्या पूर्णपणे मोफत कॅरम उपक्रमास यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे दर्जेदार आयोजनासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि पदाधिकारी सुनील साळवी, नरेंद्र सावंत, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे आदी विशेष कार्यरत आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे संघ निर्माण करण्यात येणार असून १ ते ३ मे दरम्यान अटीतटीचे सामने पाहण्यास मिळतील. शालेय खेळाडूंना तज्ञांचे मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे. सदर शेवटच्या टप्प्यामधील उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २३ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा. ००००००००००

 शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर राज्य शासनाकडूनही कौतुकाची थाप पडू दे

  – राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या कौतुक सोहळ्यात अध्यक्ष खानविलकरांचे शासनाला आवाहन मुंबई, दि.२० -जिंकायला दम लागतो आणि जिंकल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप पुढच्या यशाची आग पेटवते. यंदा ही आग क्रीडाप्रेमी कुणाल केरकर यांनी शरीरसौष्ठवपटूंच्या नसानसांत पेटवली आहे. त्यांच्यासारख्या क्रीडाप्रेमींमुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद आणखी बळकट झालीय. अशीच कौतुकाची थाप शासनाकडूनही आमच्या खेळाडूंच्या पाठीवर पडायला हवी. राजकीय व्यक्तींनी आमच्या खेळाला आपले बळ दिले तर शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला असलेली मुंबई अभेद्य होईल. त्याला कुणीही तोडू शकणार नाही, वाकवू शकणार नाही अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी  राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या मुंबईकर खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एक-दोन नव्हे तर १४ पदकांची कमाई करत मुंबईची ताकद अवघ्या हिंदुस्थानला दाखवली होती. या यशानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचे कुणाल केरकर यांनी मालाड पश्चिमेला आयर्न पॅराडाइज जिममध्ये कौतुक सोहळ्याचे प्रेरणादायी आयोजन केले ंहोते. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा हा पुढाकार शरीरसौष्ठवाला बळ देणारा ठरला. केरकर यांचे शरीरसौष्ठव आणि खेळाडूंवर असलेले प्रेम असेच बळ देणारे होत जावो, असे गौरवोद्गारही याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी काढले. याप्रसंगी केरकर यांनीही आपण खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे आश्वासन दिले. या कौतुक सोहळ्यानिमित्त हरमीत सिंग, उमेश गुप्ता, रेखा शिंदे, राजेश तारवे, संदीप सावळे, नीलेश दगडे, विश्वंभर राऊळ, नीलेश गुरव या सुवर्णविजेत्या खेळाडूंसह गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे, नीलेश रेमजे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच आयर्न पॅराडाइजच्या प्रशांत घोलम, सिद्धांत यादव आणि क्षितीज साळुंखे या शरीरसौष्ठवपटूंनाही सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळयाला शरीरासौष्ठव संघटनेचे किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, अशोक शेलार, राजेश निकम, जयदीप पवार, विजय झगडे आणि शरीरसौष्ठवातील दिग्गजांसह विजेत्या खेळाडूंचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.