Category: होम

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ पालघर विभागात १०८ रुग्णवाहिन्यांबाबत गंभीर तक्रारी योगेश चांदेकर पालघरः राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात सध्या १०८ च्या २९ रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी त्या रुग्णवाहिकांची स्थिती अतीशय दयनीय आहे त्यामुळे अनेक रुग्णवाहिका तांत्रिक बिघाडामुळे मध्येच बंद पडतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत डहाणू तालुक्यातील वरोर येथे अशीच एक रुग्णवाहिका क्रमांक MH१४ CL.०६८४ रस्त्यात दीड तास बंद पडली होती; परंतु पर्यायी व्यवस्था वेळेत न केल्याने रुग्णाचे हाल झाले. राज्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात आणि महामार्गावर रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने १०८ सेवा सुरू केली. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये ही सेवा हीच जीवनरेषा मानली जाते; परंतु गेल्या अनेक वर्षापासून १०८ रुग्णसेवेबाबत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णवाहिका कुठेही बंद पडतात. काही वाहनांची देखभाल वेळेवर न झाल्याने त्या बंद अवस्थेत आहेत, तर काही वापरण्यास अयोग्य ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का नाही? पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्य आणि केंद्र सरकार आदिवासी विभागातील रुग्णसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र आदिवासी विभागातील रुग्णसेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या आठवड्यातच याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते, तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत पालघर जिल्ह्यातील रुग्णसेवेचा पंचनामा केला होता. या पार्श्वभूमीवर आज पालघर येथे अनुसया मंगल्या भोईर यांना तातडीने रक्ताची तसेच ऑक्सिजनची गरज होती; परंतु पालघर येथे या सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने या महिलेला डहाणू येथे पाठवण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का उपलब्ध होऊ शकला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयाला रेफर करण्याचा अजब प्रकार पालघरमध्ये झाला. रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही नाही रक्त आणि ऑक्सिजन पालघरला उपलब्ध न झाल्याने १०८ रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेतून या वयोवृद्ध महिलेला डहाणूला पाठवण्यात आले; परंतु पालघरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच ही रुग्णवाहिका बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपयश आले. पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी करूनही ती दीड तासापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. रक्त आणि ऑक्सिजनची तातडीची गरज असतानाही या महिलेला उपचारासाठी तसेच थांबून राहावे लागले. विशेष म्हणजे तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या वेळी अशा रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर देणे आवश्यक असतानाही या रुग्ण महिलेसोबत डॉक्टर दिलेला नव्हता. त्यामुळे पालघरचा आरोग्य विभाग किती निष्क्रिय आहे आणि किती बेपर्वाईने काम करतो हे यातून दिसून आले. आरोग्य विभागाकडून हेळसांड रुग्णवाहिका चालकाने पर्यायी रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला; परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालघर जिल्ह्यातील आरोग्यव्यस्थेची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय आदीमध्ये डॉक्टरांची कमतरता असते. वेळेवर ‘ऑन कॉल’ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी कसे दोन-तीन तास फिरावे लागले आणि शेवटी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला, हे गेल्याच महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालकाकडे पाठवला असला, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नसताना आता पुन्हा रुग्णसेवेच्या हेळसांडीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुले, महिला, वयोवृद्धांना फटका आदिवासी, दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा तातडीने पोहोचणे आवश्यक आहे; परंतु अशाच भागामध्ये रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने गंभीर रुग्णांना जीव गमावा लागण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. आरोग्य विभागाने तातडीने रुग्णवाहिकाची दुरुस्ती, आरोग्य विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. आ. वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या पालघर जिल्ह्यातील  डहाणू व अन्य ठिकाणच्या आरोग्य संदर्भातील तक्रारीची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अजून आरोग्य विभाग पुरेसा हललेला दिसत नाही, हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. १०८ रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे महिलेला एक ते दीड तास उपचारा अभावी ताटकळत रहावे लागले ही बाब गंभीर आहे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. रुग्णवाहिकेमधील महिलेवर योग्य उपचार करावे याबाबत डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत वरीष्ठ कार्यालयाला अनेकदा अहवालही पाठवले आहेत डॉ.रामदास मराड, जिल्हाशल्य चिकित्सक पालघर

आम्ही सातारकर उद्योजक संघाचा ४ एप्रिलला भव्य व्यावसायिक मेळावा

मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संलग्न आम्ही सातारकर उद्योजक संघाचा भव्य व्यावसायिक मेळआवा ४ एप्रिलला होणार आहे. हा मेळावा मनोहर जोशी हायस्कूल, निसर्ग उद्यानासमोर, धारावी, मुंबई येथे सकाळी १०…

 पनवेलमध्ये कराओके गीत गायन स्पर्धेची सुरेल मेजवानी

 पनवेलमध्ये कराओके गीत गायन स्पर्धेची सुरेल मेजवानी  ६ एप्रिलला रंगणार नवोदितांना संधी राज भंडारी पनवेल : गायनाची आवड असूनही योग्य व्यासपीठ न मिळालेल्या नवोदित व हौशी गायक-गायिकांसाठी एस आर कराओके स्टुडिओच्या…

‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचा प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सहभाग

अनिल ठाणेकर मुंबई, प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सागर जोंधळे आणि अनीता म्हात्रे, ‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचे मालक म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही प्रतिष्ठित स्पर्धा ३१ मार्च २०२६ पर्यंत सुंदर उमियम वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये एकूण १४ टीम्स, १८२ सहभागी, ८ देश आणि ५८ आंतरराष्ट्रीय सेलर्स सहभागी झाले आहेत जे या स्पर्धेचा जागतिक दर्जा आणि भव्यता दर्शवतात. ‘मुंबई मेरिडियन्स’ टीमची खासियत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधता. या टीममध्ये रशिया, मलेशिया आणि मुंबई येथील उत्कृष्ट खेळाडू सहभागी आहेत, जे एकत्र येऊन जागतिक स्पर्धात्मकता आणि टीमवर्क दाखवत आहेत. प्रशिक्षक, वर्ल्ड चॅम्पियन कोच विकास कपिला यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि एशियन चॅम्पियन टीम मॅनेजर शिल्पा ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली, सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज आहोत. ‘मुंबई मेरिडियन्स’ ही केवळ एक टीम नाही ती एक मिशन आहे. ‘मुंबई मेरिडियन्स टीमला सपोर्ट करा, आणि चला एकत्र येऊन भारताला जागतिक नौकानयन मंचावर उजळून टाकूया.भारतामध्ये नौकानयन खेळाला नवीन उंचीवर नेण्याचं, आणि युवा पिढीला या साहसी खेळासाठी प्रेरित करण्याचे सर्व क्रीडाप्रेमींना आणि देशवासियांना आवाहन सागर जोंधळे यांनी केले आहे. 00000000

एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करण्याची राष्ट्रवादीची मागणी

एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करण्याची राष्ट्रवादीची मागणी वल्ली राजन यांनी घेतली तहसीलदारांची भेट कल्याण : सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नाही, तसेच काही ठिकाणी काळाबाजार, अतिरिक्त पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन ग्राहकांना पूर्ण सहकार्य करावे, बुकिंगनुसार वेळेत सिलेंडर वितरण करावे, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त पैसे आकारणी किंवा काळाबाजार करू नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते वल्ली राजन यांनी कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देत केली आहे. ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर ठराविक वेळेत गॅस पुरवठा करावा. होम डिलिव्हरीसाठी शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत. कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा. या बाबींचे पालन न झाल्यास संबंधित गॅस एजन्सीविरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल. तथापि, सद्य परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासन व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन वल्ली राजन यांनी सर्व गॅस एजन्सीच्या  व्यवस्थापकांना पत्राद्वारे केले आहे.

 महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धा

डॉली गुप्ता कास्य पदकाची मानकरी ठाणे :  हरिभाई देवाकरण प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या ठिकाणी झालेल्या २०२६ च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मीरा,भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा महिला कुस्तीपटू डॉली गुप्ताने चमकदार कामगिरी करताना ६२ किलो वजनी गटात कास्य पदक मिळवले. या स्पर्धेत तिला  पहिल्या  सामन्यात  कोल्हापूरच्या राधिका ढेरे सोबत  झालेल्या‌ लढतीत गुणांवर हार खावी लागली.  कुस्तीच्या नियमानुसार तिचा प्रतिस्पर्धी  फायनलमध्ये पोहोचल्यावर रीपॅच नियमा नुसार डॉली ला कास्य  पदकाच्या लढतीसाठी संधी मिळाली. या संधीचा तिने लाभ घेतला. या वेळी तिची दुसरी लढत रायगड च्या वैष्णवी कुंभार सोबत झाली. या सामन्यात डॉलीने  ही कुस्ती सहज जिंकली.मग  डॉली ची कास्य पदकाची लढत नाशिक शहर च्या संस्कृती शिरसाट सोबत झाली या सामन्यात डॉली ने आक्रमक खेळी करत संस्कृती ला चितपट करून कांस्य पदक आपल्या नावी केले. डॉली सध्या बाल-भारती का.एम.जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स, कांदिवली (पश्चिम), येथे वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. डॉली गेली ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विविध स्पर्धात सहभागी होत असुन तिने बऱ्यापेकी पदकांची कमाई देखील केली आहे.   तिला ‌वसंतराव पाटील व एन.आय.एस कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळत आहे. 0000000

रस्ते अपघातात मयत व्यक्तीच्या अवयवदानाने ९ जणांना मिळाले जीवनदान – डॉ. रणवीर कोष्टी

रस्ते अपघातात मयत व्यक्तीच्या अवयवदानाने ९ जणांना मिळाले जीवनदान – डॉ. रणवीर कोष्टी अनिल ठाणेकर ठाणे- रस्ते अपघातात एका ३३ वर्षीय व्यक्तीचे ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयव दानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलने घेतला. सदर व्यक्तीच्या अवयवदानाने मुंबईतील विविध रुग्णालयातील ९ जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाण्यातील हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे विश्वस्त अजय आशर, महेश राजदेरकर आणि डॉक्टरची टीम उपस्थित होती. २९ मार्च ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एक ३३ वर्षीय व्यक्तीचे रस्ते अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मयत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्याच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हदय, २ किडनी, लिव्हर, पॅक्ट्रिया, कॉर्निया, बोन ब्राईज असे पार्ट डोनेट करण्यासाठी संकलित करण्यात आले. यामध्ये लिव्हरचे दोन पार्ट करण्यात आले. त्याला स्प्लीट लिव्हर असे म्हणतात. केईम आणि अपोलो हॉस्पिटल असे दोन ठिकाणी पाठविण्यात आले. यात विशेष म्हणजे ९ वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लाट करण्यात यश आले. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे २४ तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अववय ९ रुग्णांना तातडीने प्रत्यारोपण केल्याचे त्या त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. ही सर्व प्रक्रिया ४० डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली. ब्रेन डेडबाबत डॉक्टरांनी सांगितले की १०० टक्के ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईंकांकडून स्विकृती घेवूनच रुग्णाला मृत घोषित केले जाते. यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्यांच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. सदर अवयव दान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, सहीयारा बोन बँक येथे विविध अवयव पाठविण्यात आले. अवयव दानात सर्वाधिक मागणी किडणीला ट्रान्सपार्टला असून जवळजवळ ६० ते ७० हजार रुग्ण प्रतिक्षेत  आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येतात. लाखो पेशंट हे अवयवासाठी प्रतिक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरविण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते. महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आणि सुविधा पुरविण्यात येते. रुग्णांच्या सेवेसाठी आमचे रुग्णालय सज्ज आहे. आमच्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. अवयव दान ही चळवळ असून ती अधिक वाढविण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरीब – गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जनतेने येथे येवून नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावे, असा आमचा प्रयत्न आहे.

हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त महिला मेळावा

योगेश चांदेकर पालघर- डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील पांचाळ समाज सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.  महिला ही अबला नसून ती माता लक्ष्मी, सरस्वती, जगदंबा, दुर्गा, चंडिका, रणचंडी चे रूप आहे.  महिला सक्षमीकरण महिलांचा सन्मान, समान हक्क, त्यांचा अधिकार आहे. आई , बहीण, सून, मैत्रीण, पत्नी, अशा विविध भूमिका ती निभावत असते, आणि आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला आधार देत असते, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले. या महिला मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राज्यमंत्री मनीषा ताई निमकर, वैदही वाढाण, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, तालुका प्रमुख रवी चौधरी, संजय चौधरी, शिवसेना युवा प्रमुख साइराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, शहर महिला संघटिका दीपा पमाळे, भारती सावे, नीलम म्हात्रे, सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा सेने पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा (राजेंद्र साळसकर) मुंबई- मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक ‘पंजाब मेल’ (ट्रेन क्रमांक १२१३७/१२१३८) च्या ‘ट्रेन महोत्सवा’चे आयोजन करत असल्याची घोषणा मोठ्या  अभिमानाने केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच ३० मार्च २०२६ रोजी  संध्याकाळी ६.३५ वाजता, या उत्सवाला सुरुवात होईल. या गाडीला वारसा-आधारित  नक्षीकाम आणि दृश्यांनी सुशोभित करण्यात येईल; जे तिचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करेल. हा सोहळा ‘पंजाब मेल’च्या प्रवासाचा लक्ष  वेधून घेईल, जी भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे,. ‘ट्रेन महोत्सव’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘पंजाब मेल’ची ऐतिहासिक मोहिनी अबाधित राखतच, प्रवाशांचा आराम व सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने या गाडीचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे: आतील भाग (प्रथम वातानुकूलित), उत्तम सौंदर्यासाठी कूपै आणि आयल पॅनेलवर विनाइल रॅपिंग. बाहेरील ब्रँडिंगमध्ये प्रथम वातानुकूलित-  द्वितीय वातानुकूलित संयुक्त कोच आणि पॅन्ट्री कारवर वारसा-थीम असलेल्या चित्रांसह विनाइल रॅपिंगने केले गेले आहे. पंजाब मेलचा १९१२ चा वारसा, महाराष्ट्र-पंजाब संबंध आणि स्वातंत्र्य लढ्याशी असलेला संबंध दर्शवणारी रचना; ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिराचे स्क्रीन प्रिंट्स आहेत. वातानुकूलित कोचच्या  आत वॉटरप्रूफ कॅनव्हास प्रिंट्स, ज्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो.  सर्व वातानुकूलित कोचमध्ये नवीन पडदे पुरवले आहेत. ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेंसर, सुधारित बिब कॉक, सोप डिस्पेंसर, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती आणि स्क्रॅपर मॅट्सची तरतूद. सामायिक जागा: अधिक टिकाऊपणासाठी गँगवे, दरवाजे आणि शौचालयांमध्ये विनाइल रॅपिंग. फलक: सर्व कोचमध्ये एकसमानता आणण्यासाठी वारसा-थीम असलेले फलक. फायनल टच: अधिक सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्जवर रंगाचा फायनल टच-अप करण्यात आला आहे. पंजाब मेल, जी मूळतः पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांहून अधिक जुनी आहे.बॅलार्ड पिअर मेल स्टेशन एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) सेवांसाठी एक प्रमुख केंद्र होते, जिथून पंजाब मोलचा प्रवास सुरू होत असे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल येथून या गाडीने आपला पहिला प्रवास सुरू केला. अनेक दशकांपासून, प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला हा प्रवास मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. ‘पंजाब मेल’ ही केवळ एक रेल्वेगाडी नाही; तर तो एक जिवंत वारसा आहे, ज्याने पिढ्यान- पिढ्या विविध प्रदेश, लोक आणि इतिहास यांना परस्परांशी जोडले आहे. आपल्या खोलवर रुजलेल्या वारशासह आणि सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे, परंपरा आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांचा सुरेख मेळ घालण्याच्या ‘मध्य रेल्वे’च्या कटिबद्धतेचे ती एक प्रतिक म्हणून उभी आहे.  मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगती यांच्या या उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करते.

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर मोठा भर महापालिकेतील कामाविषयी आमदारांचं पत्रकारांसमोर स्पष्टीकरण अरविंद जोशी मिरा-भाईंदर : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका कडून संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शिक्षण, आरोग्य, परिवहन व पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील एका वर्षात शहरात लक्षणीय बदल दिसून येतील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.अशी माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माननीय महापौर डिंपल मेहता, माननीय उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील व माननीय स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेत CBSE बोर्ड सुरू करण्याचा विचार पुढे आणण्यात आला आहे. तसेच एका वर्गात ५० टक्के खाजगी विद्यार्थी व ५० टक्के महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा अभिनव प्रयोग, यासोबतच शिक्षण संस्थांनी शाळा दत्तक घेण्याची संकल्पना, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.याच बरोबर क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपक्षण केंद्र, पशु चिकित्सक, अग्निशमन संगणक, मालमत्ता शोध मोहीम, जेष्ठ नागरिक, तलाव सुशोभीकरण, नवीन रस्ते, नाले, वैध्यकीय विभाग, औषध आरोग्य केंद्र, घणकचरा अश्या अनेक गोष्टीचा देखील अर्थ संकल्पात समावेश करण्यात आला आहे. 100 नवी शौचालय, विद्यमान शौचालयांची स्थिती सुधारली जाणार आहे. वाहतूक व बाजार व्यवस्थापनासाठी रामदेव पार्क आणि मिरारोड स्थानक परिसरात तळमजल्यावर फेरीवाल्यांसाठी व्यवस्था व त्यावर पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. तसेच १० एप्रिलपासून शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे. पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, परिवहन सेवेतही सुधारणा, आरोग्य क्षेत्रात मोठा निर्णय घेत शहरात MRI मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. एकूणच, या अर्थसंकल्पातून मिरा-भाईंदर शहराच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट झाला असून आगामी काळात नागरिकांना अधिक सुविधा आणि सुधारित पायाभूत व्यवस्था मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्लेझन्ट पार्क परिसरात लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे, तसेच यासंदर्भात आलेल्या प्रस्तानावर विचार चालू असल्याचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं देत होते. आगी नंतरच्या केलेल्या पाहणीत आमदार तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी लोकांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं होतं.