Category: मुंबई

Mumbai news

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

चिकणघर परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी  कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे  रस्त्यांवरील हे खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे निवेदन दिले होते. त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच पावसात ते रस्ते पुन्हा वाहून गेले आणि खड्ड्यांची समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाली आहे. याच कारणामुळे पुन्हा महानगरपालिकेकडे निवेदन देऊन संबंधित रस्त्यांची तातडीने, दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका कमी होईल. चिकणघर परिसरातील संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्‌डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर तीन ते चार शाळा असून दररोज हजारो शाळकरी वि‌द्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही यासंदर्भात महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तरी या बाबीची तातडीने दखल घेऊन संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

 ३४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था व सातारा जिल्हा रहिवासी संघाच्या वतीने दिवा : अजिंक्यतारा सामाजिक सेवा संस्था आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ (दिवा शहर) यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य…

– अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती चे प्रकाशन नागपूरमध्ये

– साहित्य भारती आणि साईज्योती पब्लिकेशन्स चे आयोजन नागपूर: ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १ भाग २ आणि भाग ३ चे प्रकाशन गुरुवार दिनांक १६ जुलै  २०२६ रोजी सायंकाळी  ६ वाजता नवदृष्टी सभागृह, अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे होणार आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत, आणि साईज्योती पब्लिकेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे हस्ते हे प्रकाशन होणार असून माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर पुस्तकांवर भाष्य करणार आहेत. आपल्या ५४ वर्षाच्या पत्रकारिता आणि सामाजिक जीवनाच्या कालखंडात ज्या अनेक मान्यवर व्यक्तींशी अविनाश पाठक यांचे व्यक्तिगत संबंध आले आणि ते उभयपक्षी जपले गेले, अशा एकूण  ५१ मान्यवर व्यक्तींवर अविनाश पाठक यांनी लेख लिहिले असून त्याचे संकलन तीन भागात साईज्योती पब्लिकेशन ने “आयुष्यातले सांगाती” भाग १, २ आणि ३ असे प्रकाशित केले आहेत. या ५१ मान्यवर व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले, गिरिजा कीर, नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपती शक्तीकुमार संचेती, पत्रकार मा.गो. वैद्य, संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला, प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी, पत्रकार नीला उपाध्ये, सुरेश द्वादशीवार, श्रीपाद सहस्रभोजने, राम खांडेकर, अनंत तरे, डॉ. तनुजा नाफडे, दत्ता मेघे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. प्रमिलाताई मेढे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे, अजय संचेती, चैनसुख संचेती, डॉ  विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, डॉ उदय निरगुडकर, हंसराज अहिर, वामनराव चोरघडे, मारोती चितमपल्ली, शुभांगी भडभडे, भगतसिंह कोशियारी, उल्हास पवार, न्या. विकास सिरपुरकर, डॉ वि.भि.कोलते, गोपीनाथ मुंडे, प्रा बी.टी.देशमुख, डॉ श्रीकांत जिचकार, वसंतराव साठे, डॉ मनोहर पिंगळे, अभिनंदन थोरात, गंगाधरराव फडणवीस,दत्ताजी डिडोळकर, कवी अनिल, डॉ मधुकर आष्टीकर, प्रतापदादा सोनवणे,नीतिन केळकर,सद्गुरुदास महाराज, डॉ प्रमोद कोलवाडकर या मान्यवरांचा समावेश आहे. या तीन भागांना डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. विकास महात्मे आणि अजय संचेती यांच्या प्रस्तावना आहेत. अविनाश पाठक यांची यापूर्वी एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात डावपेच, शह काटशह आणि सत्तेच्या सावलीत हे तीन राजकीय कथासंग्रह, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, थोडं आंबट थोडं गोड आणि हितगुज हे ललित लेखांचे संग्रह, दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, काल प्रवाहाच्या वळणांवरून आणि दृष्टीक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे देशातील गाजलेल्या कोळसा घोटाळ्यावरील पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, आणि मराठी वांङमय व्यवहार: चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. या समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, कार्याध्यक्ष डॉ शेखर भुसारी, महामंत्री विनय माहुरकर साईज्योती पब्लिकेशन चे ज्योती खापेकर,  गणेश राऊत प्रभृतींनी केले आहे. 0000000000

उल्हासनगरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांच्या चौकशीची मागणी

सुनिल इंगळे उल्हासनगर : युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी उल्हासनगर शहरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची सखोल तपासणी करून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

– ठाण्यात रंगणार कलगीतुऱ्याचा थरार

लोककला रसिकांसाठी पर्वणी अनिल ठाणेकर ठाणे : कोकणातील पारंपरिक लोककलेचा अनोखा ठेवा असलेल्या ‘कलगीतुऱ्या’चा थरार आता ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शुक्रवार, १७ जुलै, सायंकाळी ७.३० वाजता भव्य कलगीतुऱ्याच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत लोककला रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या बहारदार सामन्यात कलगीवाले शाहीर संदीप मोरे आणि तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन यांच्यात सवाल-जवाब, हजरजबाबी फटकेबाजी, उत्स्फूर्त सादरीकरण आणि पारंपरिक लोककलेचा रंगतदार आविष्कार पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कलगीतुऱ्याचा वारसा आधुनिक सादरीकरणातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे. अतुल कदम आणि सुनील कदम यांच्या निर्मितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरभाई सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, तिकिटांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यक्रम हाऊसफुल होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, माजी महापौर अशोक वैती, युवासेना अधिकारी ऋषिकेश माने, अभिनेते मंगेश देसाई, भाऊ कदम, गौरव मोरे, उद्योजक विकास दाभाडे तसेच समाजसेवक संदीप बिरवटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे, कलगीतुऱ्याच्या इतिहासात प्रथमच १० भाग्यवान प्रेक्षकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. कोकणच्या मातीत रुजलेली ही समृद्ध लोककला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि नव्या पिढीने तिचा वारसा जपावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. लोककलेची आवड असलेल्या प्रत्येकाने या सांस्कृतिक मेजवानीला उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त दाद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ख्रिश्चन विवाह निबंधकाची नियुक्ती करा-वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रात ख्रिश्चन विवाह निबंधक (Registrar) नसल्याने या समाजातील विवाह व विवाह संबंधित कामे खोळंबली आहेत. विवाद निबंधक नसल्यामुळे मुंबई विभागाला प्रशासकीय विलंबाचा सामना करावा लागत आहे. सरकारने तातडीने…

समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करा – माकप

अनिल ठाणेकर ठाणे : समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक व महिला प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी–मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मरियम ढवळे, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, रेहाना शेख यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात समान नागरी कायद्याचा (Uniform Civil Code) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. सर्व जाती-धर्मांतील महिलांना समान न्याय, समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पोटगी अशा नागरी बाबींमध्ये महिलांना समान हक्क आणि न्याय मिळण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा झाल्याच पाहिजेत. समान नागरी कायद्याच्या कोणत्याही चर्चेच्या केंद्रस्थानी सर्व जाती-धर्मांतील महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष मूल्ये असली पाहिजेत. मात्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीची रचना पाहता तिच्या सर्वसमावेशकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. समान नागरी कायद्याबाबत देशभरात सर्वाधिक चर्चा ज्या मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक कायद्यांच्या संदर्भात होत असते, त्या मुस्लिम समाजातील कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी किंवा सामाजिक तज्ज्ञ यांना समितीत स्थान देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित अल्पसंख्याक समाजांचेही प्रतिनिधित्व समितीत दिसून येत नाही. याशिवाय, सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या अधिकारांच्या दृष्टीने काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींनाही समितीत स्थान देण्यात आलेले नाही. अशा महत्त्वाच्या विषयावर तयार होणारा कायदा व्यापक सामाजिक स्वीकारार्हता मिळवायचा असेल, तर त्याच्या मसुदा प्रक्रियेत सर्व संबंधित समाजघटकांचा सहभाग आवश्यक आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील जाणकार कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी आणि सामाजिक तज्ज्ञ, तसेच सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समितीत समावेश करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कायद्यात महिलांच्या सामाजिक न्याय, समान हक्क आणि घटनात्मक संरक्षणासंबंधी अधिक प्रभावी तरतुदी करता येतील. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र शासनाकडे पुढील मागण्या करीत आहे: समान नागरी कायद्याच्या समितीत मुस्लिम समाजातील पात्र कायदेतज्ज्ञ, महिला प्रतिनिधी व सामाजिक तज्ज्ञांचा तातडीने समावेश करावा. सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींना समितीत स्थान द्यावे, जेणेकरून कायद्यात महिलांच्या सामाजिक न्यायाची प्रभावी हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट करता येतील.ख्रिस्ती, पारशी तसेच इतर संबंधित समाजघटकांचेही प्रतिनिधित्व समितीत सुनिश्चित करावे.समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवावी.सर्व संबंधित धार्मिक, सामाजिक, महिला व कायदेविषयक संघटनांशी व्यापक सल्लामसलत करूनच अंतिम मसुदा तयार करावा. कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करण्याऐवजी भारतीय राज्यघटनेतील समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या आधारे कायदा तयार करावा. लोकशाही व्यवस्थेत अशा स्वरूपाचा व्यापक परिणाम करणारा कायदा लोकसहभाग, संवाद आणि सर्वसमावेशकतेच्या आधारेच तयार झाला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने समितीची पुनर्रचना करून त्यामध्ये मुस्लिम समाजासह सर्व संबंधित समाजघटक आणि सर्व जाती-धर्मांतील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष  करत आहे. 00000000000

नगरसेवक रमेश म्हात्रेंवर अद्यापही पक्षांतर्गत कारवाई नाहीच

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

कल्याण न्यायालयात वकिलांचे पोलिसांविरोधात आंदोलन

 लाल फित बांधून कल्याण बार असोसिएशनचा निषेध कल्याण : डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणीदरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत कल्याणमधील वकिलांनी आज अनोखे आंदोलन छेडले. न्यायालयीन कामकाज सुरू ठेवत वकिलांनी लाल फित बांधून पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात चर्चांना उधाण आले आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे, यांच्या रिमांड सुनावणीवेळी काही पोलिस अधिकाऱ्यांनी वकिलांना धमकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप कल्याण बार असोसिएशनकडून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकिलांनी लाल फित बांधून कामकाज सुरू ठेवले. न्यायालयीन प्रक्रियेत वकिलांचा सन्मान राखला जावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे पोलिस आणि वकील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी सुनावणीसाठी आणलेल्या एका  राजकीय आरोपीला पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवली होती. यावेळी सर्व पोलीस हे त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असल्याप्रमाणे वावरत होते यावेळी पोलिसांनी वकिलांना धक्काबुक्की करत गुन्हा दाखल करू अशी धमकी देत विनापरवानगी वकिलांचे चित्रीकरण केले. याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून याबाबत लेखी तक्रार न्यायाधीशांकडे करण्यात आली असून उच्चन्यायालयात देखील हि बाब नेणार असल्याचे  ऍड श्रद्धा शिवमते जोशी यांनी सांगितले. तर याआधी कधीही अशाप्रकारे लाल फीत लावून काम करण्याची आवश्यकता वाटली नाही. मात्र वकिलांवर अन्याय झाल्याने हे लालफीत लावून आंदोलन केले आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असून जोपर्यत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लालफीत लावून आंदोलन करणार असल्याची  प्रतिक्रिया ऍड प्रदीप बावस्कर यांनी दिली.

आशियाई जलतरण स्पर्धा

स्वराज लाड, गीतिका सालियन तर प्रशिक्षक तुषार गीतये यांची भारतीय संघात निवड मुंबई, प्रतिनिधी : थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या १२व्या आशियाई वयोगट जलतरण (अॅक्वॅटिक) अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून,ही स्पर्धा १६ ते २१ जुलै या कालावधीत बँकॉक (थायलंड) येथे होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील चार डायव्हर्स पैकी मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील दोन डायव्हर्स आणि एका प्रशिक्षकाची निवड झाली आहे. स्वराज राजेंद्र लाड याची १८ वर्षांखालील मुलांच्या गटातील ३ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारासाठी, तर गीतिका सालियन हिची १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तसेच, विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रशिक्षक तुषार गितये यांची या स्पर्धेसाठी भारतीय डायव्हिंग संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत स्वराज लाड आणि गीतिका सालियन भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, प्रशिक्षक म्हणून तुषार गितये संघास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. -000000